Monday, June 11, 2012

हरवलेली माणुसकी


कुलदीपकच हवा, शुध्द अंधविश्वास. 
मुलीचा गर्भ पोहचे,पार गटार गंगेस. 
निसर्गाचा समतोल पार बिघडून जाई. 
पुरुषाचा स्त्रीवाचून जन्मच वाया जाई. 

भ्रष्ट आचार आता नित्य नेम झाला. 
अंध वासनांच्या त्या उफाळती ज्वाला. 
कधी बळी जाते बिचारी अबला नार. 
तर कधी होरपळे ते बाल्य सुकुमार. 

संपत्तीचाच हव्यास भर-भरून राही. 
भावाची ओळख आता भावास नाही. 
अविचार , स्वार्थाने भिनली जमात. 
माता-पित्यास सोडती दूर वृद्धाश्रमात. 

नीती मूल्यांचा होई र्‍हासच जणू हा. 
सभोवर जनावरांचा भासच जणू हा. 
प्रकृतीचे हे दुष्ट स्वप्न विरून जावे. 
मनुष्यास माणुसकीचे आता भान यावे. 

कवी : बाळासाहेब तानवडे 
© बाळासाहेब तानवडे – ११/०६/२०१२ 

http://kavyarangmaze.blogspot.com/