Sunday, October 31, 2010

पुढच पाऊल



प्रत्येकाला हवा हवासा 
अमूल्य सुंदर जन्म देता.
बालपणीच्या कोवळ्या स्वप्नांना,
सप्तरंगी रंग देता.

जीवापाड जपताना ,
सुख - दु:खाना अतूट साथ -संग देता.
शिक्षण देऊन मोलाचं, 
भावी सुख स्वप्नात तुम्ही दंग होता.

तारुण्याचा बहर सावरताना,
भविष्याची सुखस्वप्ने न्याहाळताना.
अचानक प्रेम स्वरूप समोर येते ,
मग आमच्या स्वप्नांना सत्य रूप येते.

प्रेमाचा अंकुर मोहरतो ,
प्रेमाचा वसंत बहरतो.
मग एक दुसऱ्या वाचून न जगण्याच्या,
अणाभाकांचा, कहर होतो.

ना जातीला स्थान असतं ,
ना धर्माचं भान असतं .
प्रेमाच्या अमूल्य क्षणासाठी ,
आमच जीवन सार गहाण असतं.

तुमच्या अन गणगोतांच्या विरोधाला,
तलवारीची धार असते.
विलग न होण्याचे धैर्य,
सर्व कक्षांच्या पार असते.

नकळत पुढच पाऊल टाकून बसतो ,
परतीचा मार्ग सर्व बाजूने खचतो.
तेंव्हा गरज असते तुमच्या खंभीर साथीची,
साथ हवी असते सार्थ विश्वासाची.

तेंव्हाच तुम्ही पाठ फिरवता ,
नात्याची घट्ट गाठ निरवता.
समाजाच्या निरर्थक भीतीपोटी ,
जपलेल्या अतूट नात्याला क्षणात पूर्ण विराम देता.

असे किती दिवस चालत राहावे?
पोटच्या गोळ्यांना जितेपणी मारत राहावे.
मागच्यानी केले तेच परत करत रहावे. 
संकुचित वर्तुळात फिरत रहावे.

म्हणून जाती -धर्म भेद दूर सारा,
गढूळ मनांना शुद्ध प्रेमाने भरा.
माणुसकी हाच मुळ धर्म आपला ,
ज्याने समानता सद्गुण जपला.

कवी : बाळासाहेब तानवडे 

© बाळासाहेब तानवडे २३/१०/२०१०

No comments:

Post a Comment